सानियो स्पेशल स्टील खोपोली येथे ५५ व्या सुरक्षितता महिन्याची उत्साहात सांगता.

खोपोली – प्रतिनीधी
दिनांक. ८ एप्रिल सानियो स्पेशल स्टील खोपोली येथे ४ मार्च ते ४ एप्रिल हा सुरक्षा महिना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महिन्यात कंपनीमध्ये घोषणा वाक्य स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा,कायझन स्पर्धा,मॉक ड्रिल स्पर्धा,इत्यादी अनेक स्पर्धा कामगार कर्मचारी तसेच जे. सी. एम. एम. शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या या सर्व उपक्रमांमध्ये कामगार कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.


या 55 व्या सुरक्षितता महिन्याच्या सांगता समारोह प्रसंगी प्रमुख मान्यवर श्री लक्ष्मीकांत गोराणे उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग रायगड तसेच डॉ. विशाल नेहुल साहेब डी. वाय. एस. पी. खालापूर रायगड उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व स्पर्धा मधील विजेते कामगार कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाचे उपसंचालक श्री. लक्ष्मीकांत गोराणे यांनी उपस्थितांना विविध उदाहरणाच्या माध्यमातून औद्योगिक सुरक्षा कशी महत्त्वाची आहे. हे समजावून सांगितले. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे सुरक्षा स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल कौतुक केले. तसेच कंपनीच्या सुरक्षितता प्रथम बालपणामध्ये रुजविण्याच्या प्रयत्नाबद्दल विशेष कौतुक केले. खालापूर विभागाचे डी.वाय.एस.पी डॉ. विशाल नेहुल यांनी सुरक्षितता नेहमीच महत्त्वाची असून सर्व नियमांचे पालन करायला पाहिजे असे आवाहन केले. तसेच या प्रसंगी बोलताना कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दिलीप पाचपांडे साहेब यांनी कंपनी राबवत असलेल्या सुरक्षा उपक्रमाची सविस्तरपणे माहिती सांगितली. नियर मीस अपघातामधून बोध घेऊन मोठे अपघात होणे टाळले पाहिजे असे मार्गदर्शन केले. कंपनीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर श्री. तोमोहिको ओगुरा यांनी उपस्थितांना सुरक्षा प्रथम हा कानमंत्र दिला. आपले कुटुंब आपली सुरक्षित घरी येण्याची वाट पाहत असते त्यामुळे सुरक्षित काम केले पाहिजे असे सांगितले. कंपनीचे मानव संसाधन व मनुष्य बळ विभाग प्रमुख तसेच फॅक्ट्री मॅनेजर श्री.तान्हाजी पठारे साहेब यांनी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगून कंपनीचे शून्य अपघाताचे ध्येय अधोरेखित केले.

कंपनीचे सेफ्टी अधिकारी श्री. प्रशांत जगदाळे यांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी इ. एच. एस. विभागाचे श्री. मच्छिंद्र पवार,श्री. शैलेश थरकुडे,श्री. सागर पाटील, एच. आर. विभागाचे श्री. प्रकाश बाणे, श्री. प्रवीण देशमुख, व सुरक्षा व बगीचा विभागाचे श्री. रामदास कळसे व सुरक्षितता समिती तसेच युनियन पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

